माझे अमृतरसायन

औंधची व माझी ताटातूट व्हायची नव्हती हेच खरे. पुण्याहून परत आल्यावर माझी फारच त्रेधा उडाली. सखारामाचे पैसे परत करायचे होते. जेवणाची थोडीफार व्यवस्था करायला हवी होती. काय करावे, मला समजेना. एकनाथकडे जेवायला जाण्याइतका मोकळेपणा मला अजून वाटत नव्हता; परंतु काहीतरी पोटात गेल्याशिवाय मी किती दिवस राहाणार?

शेवटी मी मावशीला पत्र लिहायचे इरवले. मावशीला पगार फार नव्हता तिला पंचवीस रुपये मिळत होते. तिच्याजवळ माझा सर्वांत धाकटा भाऊ शिकत होता. तो मला कितीशी मदत करणारत्र परंतु मी तरी कोणाला लिहिणार, कोण्ााला कळवणार? घरी वडिलांना लिहून  फारसा उपयोग होणार नव्हता. मुंबईला दादाला लिहीन, तर त्याला फक्त एकोणीस रुपये पगार! तो एखादी शिकवणी करी व पाच रुपये घरी वडिलांना पाठवी. येऊन-जाऊन मावशीच राहिली. तिच्यापुढे स्वत:ची सारी करुण कहाणी मांडण्याचे मी मनात आणले.
प्रिय मावशीस साष्टांग नमस्कार,

मावशी, तुला काय लिहू, काय सांगू? तुझ्या मनाला दु:ख होईल हे पत्र वाचून. तुझा श्याम सध्या निराधार आहे. मी औंधला आलो; परंतु एक प्रकारे फसलो. इथे कसलीच व्यवस्था होत नाही. मी निरनिराळे प्रयोग केले. माधुकरीही मागितली; परंतु ती पंधरा दिवसांनी बंद केली. माधुकरी मागणं मरणच वाटे. शिवाय इतकी घरं भटकून सुध्दा पोट नीट भरत नसे. पुढे मी हाताने स्वयंपाक करित होतो. कधी नुसती भाजीच करावी, कधी मक्याचे दाणेच खावे, असं चालवलं. पिठाची गिरणी चालवणारा एक मित्र मला पीठ देई. काही दिवस दुस-याच्या दळणातलं हे चोरुन काढून ठेवलेलं पीठ तुझा हा श्याम घेत असे. मावशी श्यामचा का तू तिरस्कार करशील? नाही, तू माझा तिटकारा करणार नाहीस. श्यामने ते पीठ घेण्याचं बंद केलं तुझ्या श्यामचा आत्मा जागृत झाला. दुस-याचं पीठ मी काय म्हणून घ्यावं, असं माझ्या मनात येऊ लागलं. मी नंतर कसातरी जगत होतो. कुणी भाकरी आणून देई, कुण्ी कधी फराळाला बोलवी. एखादे वेळेस मला वाटे, की बक-या पाला खाऊन जगतात, तसं आपल्याला नाही का जगता येणार? मी निबांचा माला खाऊ लागे, परंतु को कडू,कडू! थ्चंचेची व करवंदीची कोवळी पानं कोकणात आम्ही खात असू;  परंतु ती इथे कुठे धुंडाळू? मावशी, मध्यंतरी मी पुण्याला येऊन गेलो. एका मोठया घरी मी मुलांन शिकवायला राहायचं असं ठरलं; परंतु तिथे गेलो नि निराशा पदरात आली. मी तसाच परत आलो. स्टेशनवर एका भामटयाने फसवलं व माझ्या जवळचे पाच रुपये गेले. मी कसाबसा इथे परत आलो; परंतु इथे कसा राहाणार, कसा जगणार? माझ्या मित्राचे दहा रुपये उसने घेतले आहेत, ते परत करायचे आहेत. तो समोर दिसला, की मान खाली होते.

ती तुला हे सारं लिहिणार नव्हतो; परंतु माझ्या मनावरचं दडपण कमी करण्यासाठी लिहित आहे. तुझ्यासमोर मन मोकळं करीत आहे. मावशी, औंधला पहिल्यांदा आलो, त्याच्या दुस-या दिवशीच मी तळयात बुडत होतो. का बरं मी बुडालो नाही? कशासाठी जगलो? सर्वांना दु:ख देण्यासाठी का माझा जन्म आहे? माझा काय उपयोग? मी केव्हा शिकणार व आईच्या कधी उपयोगी येणार? माझ्या डोळयांसमोर सारखी आई येते. मी शिकेन नि आईल सुखवीन, मी शिकेन नि आईला हसवीन, असं माझ्या मनात मी नेहमी म्हणत असतो. परंतु ह्या श्यामच्या नशिवी शिकणं दिसत नाही. आईला सुख देण्याइतकी माझी पुण्याईच नसेल.

दोन दिवस झाले. मी काही खाल्लं नाही. पंख असते, तर तुझ्याजवळ उडून आलो असतो व तुला बिलगून रडलो असतो. लहानपणी मी तुझ्याजवळ निजण्यासाठी रडत असे. आजही तुझ्यासमोर पुन्हा रडत आहे. मी काय करु ते कळव. कुठे जाऊ ते सांग; परंतु तू तरी काय करशील?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel