बोधिसत्त्व म्हणाला, ''माझ्या जाण्याचें प्रयोजन दिसत नाहीं. हें काम तुलाच करितां येण्यासारखें आहे.''

भीमसेन म्हणाला, ''पण गृहस्था, वाघ पाहिल्याबरोबर माझी गाळण उडून जाईल ! आजन्मांत मी वाघाची शिकार केली नाहीं. आणि आतां तूं मला एकटा पाठवून फजिती करूं पाहतोस कीं काय ? किंवा माझ्यापेक्षांदेखील तूं भितरा आहेस ?''

बोधिसत्त्व म्हणाला, ''तुझ्या शंका व्यर्थ आहेत. वाघाची शिकार करणें मोठेंसें काम नाहीं. मी तुला एक लहानशी युक्ति सांगतों. तिच्यायोगें वाघ आपोआप मारला जाईल, व सगळें श्रेय मात्र तुला मिळेल. ज्या अरण्यांत वाघ आहे त्याच्या आसपासचे कांहीं धनुर्ग्राहक लोकांना घेऊन तूं वाघाला मारण्यासाठीं जा, आणि झुडुपांतून वाघ बाहेर पडल्याबरोबर एका झाडाचा आश्रय करून दडून बस. ते ग्रामवासी लोकच त्या वाघाला ठार मारतील. जेव्हां वाघ मेल्याची ओरड होईल तेव्हां जंगलांतील एक बळकट वेल तोडून पुढें हो, व त्या लोकांना म्हण कीं, तुम्हीं हा वाघ कोणाच्या हुकुमानें मारला. मी या वाघाला जिवंत बांधून राजाजवळ नेण्यासाठीं जंगलांत शिरलों असतां तुम्हीं एकाएकीं या वाघाला बाण मारलात, हें योग्य केलें नाहीं. ते लोक घाबरून जाऊन चूक झाल्याबद्दल तुमची क्षमा मागतील. आणि राजाला आपला अपराध न कळविण्याबद्दल तुम्हाला कांहीं पारितोषिकहि देतील.''

बोधिसत्त्वानें शिकविल्याप्रमाणें भीमसेनानें सर्व कांहीं केलें, व वाघ मारल्याचें श्रेय मिळविलें. पुढें अशाच एका अरण्यांत गवा उठला होता. त्यानें तो मार्ग ओस पडला. राजाच्या कानीं लोकांची कागाळी आल्यावर राजानें भीमसेनाची गव्याला मारण्याच्या कामीं नेमणूक केली. तेव्हां पहिल्याच युक्तीनें भीमसेनानें तिकडे लोकांना फसवून व इकडे आपणच गवा मारिला असें सांगून राजाकडून पुनः बक्षिस मिळविलें, व तो गर्वानें इतका फुगून गेला कीं, आपण बोधिसत्त्वापेक्षां पुष्कळ पटीनें शूर आहों असें त्यास वाटूं लागलें. कांहीं काळ लोटल्यावर त्या राज्यावर दुसरा एक राजा स्वारी करून आला. राजानें भीमसेनाची परराज्याचा पराभव करण्यासाठीं सेनापतीच्या जागीं नेमणूक केली. तेव्हां बोधिसत्त्वाला न विचारतां शस्त्रास्त्रांनी सज्ज होऊन आणि हत्तीच्या अंबारींत बसून सर्व सैन्यासहवर्तमान तो शत्रूवर चाल करून गेला. बोधिसत्त्वाला त्याचें शौर्य माहीत होतें. आजपर्यंत राजाचें आपण अन्न खाल्लें, व या प्रसंगी राजाला मदत न करिता भीमसेनाच्या भरंवशावर राहिल्यास पुढें काय गती होणार हें तो जाणून होता. म्हणून तो भीमसेनाच्या अवज्ञेला न जुमानितां त्याच्या मागें अंबारींत बसून युद्धभूमीवर गेला. परसेना पाहिल्याबरोबर भीमसेनाला घाम सुटला; शरीर कांपायला लागलें; व तेथल्या तेथेंच त्यानें देहधर्म केला ! बोधिसत्त्वाने त्याला सांवरून धरिलें नसतें तर तो हत्तीच्या पाठीवरून खालीच पडला असता. ही त्याची दुर्दशा पाहून बोधिसत्त्व त्याला म्हणाला, ''नुकताच तूं मोठ्या शौर्याच्या गोष्टी सांगत होतास ! माझी देखील तूं गर्वानें अंध होऊन अवज्ञा केलीस ! आणि आतां तुझी अशी दुर्दशा कां व्हावी ? तुझ्या बोलण्यांत आणि कृतींत किती फरक आहे बरें !''

भीमसेन म्हणाला, ''झालेली गोष्ट होऊन गेली. पण या प्रसंगीं मलाच नव्हे, तर या सर्व सेनेला आणि आमच्या राजाला संकटांतून पार पाडणारा तुजवांचून दुसरा कोणीच नाहीं. आतां माझ्या अपराधाची क्षमा करून आम्हां सर्वांना जीवदान दे.''

बोधिसत्त्वानें त्याला हत्तीवरून खालीं उतरविलें; स्नान वगैरे घालून दुसरे कपडे देवविले; व स्वतः सेनाधिपत्य स्वीकारून तो युद्धाला पुढें सरसांवला. बोधिसत्त्व युद्धकलेंत अत्यंत निपुण असल्यामुळें परराजाचा पराभव करण्यास त्याला आयास पडले नाहींत. एवढेंच नव्हे, त्यानें त्या राजाला जिवंत पकडून आपल्या राजासमोर नेलें. त्यावेळीं राजाला बोधिसत्त्वाची खरी किंमत समजली. राजानें त्याचा बहुमान केला, व सेनापति पदावर त्याची कायमची नेमणूक केली. बोधिसत्त्व तेव्हांपासून सर्व जंबुद्वीपांत छोटा धनुर्ग्राहपंडित या नांवानें प्रसिद्धीस आला. त्यानें भीमसेनाचा त्याग न करितां मरेपर्यंत त्याला उदरनिर्वाहापुरतें वेतन दिलें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel