भारताचे सामर्थ्य व दुर्बलता

भारताच्या सामर्थ्याची तसेच भारताच्या अवनती व र्‍हासाची कारणे शोधण्याचा मार्ग लांबचा व गुंतागुंतीचा आहे.  परंतु त्या र्‍हासाची आजची कारणे अगदी स्पष्ट आहेत.  यांत्रिक ज्ञानाचे जे नवीन तंत्र युरोपात निर्माण होत होते त्यात हा देश मागे राहिला.  पुष्कळ गोष्टींत जे युरोपखंड कित्येक वर्षे मागासलेले होते ते एकदम या नवीन उद्योगधंद्यांतील शोधामुळे पुढे आले.  या उद्योगधंद्यांतील नवतंत्रापाठीमागे शास्त्रीय दृष्टी होती, विज्ञानवृत्ती होती; त्याचप्रमाणे अनेकविध गोष्टींत नवीन होणारा, साहसी जलपर्यटनांत, संशोधनार्थ काढलेल्या सफरींतून दिसून येणारा अपार उत्साह, दुर्दम्य जीवनशक्ती हीही होती.  या नवीन शोधांनी युरोपातील राष्ट्रांना नवीन लष्करी सामर्थ्यही प्राप्त झाले.  त्यामुळे पूर्वेकडे पसरायला आणि पूर्वेवर अधिराज्य स्थापायला त्यांना कठीण गेले नाही.  ही केवळ हिंदुस्थानचीच कहाणी नाही.  बहुतेक सर्व आशियात हेच घडून आले.

हे असे का घडले त्याच्या मुळाशी जाणे अधिकच कठीण आहे.  कारण प्राचीन काळी पहिल्या पहिल्या शतकात तरी भारतही बुध्दीच्या क्षेत्रात कमी जागरूक नव्हता.  कारण उद्योगधंद्यांतील कौशल्यातही मागे नव्हता.  परंतु हळूहळू सारे बिघडत चालले होते.  ही क्रिया एकदम झाली नाही.  शतकानुशतके ही अध:पाताची, र्‍हासाची क्रिया नकळत होत होती असे वाटते.  हळूहळू नवे उद्योग हाती घ्यावे, व्याप वाढवावा हे कमी होऊ लागले.  जीवनप्रेरणा, विजिगीषू वृत्ती कमी होत गेली.  प्रतिभा लोपली, निर्मात्री वृत्ती सुकली.  केवळ अनुकरण करणारी वृत्ती आली.  सृष्टीची, या विश्वाची कोडी उलगडण्यासाठी आत घुसू पाहणारी ती बंडखोर विजयी बुध्दी दिसेनाशी झाली, व तिच्याऐवजी शब्दब्रह्मात रमणारा, टिका-टिप्पणी लिहिणारा, लांब विवरणे आणि भाष्ये लिहिणारा भाष्यकार आणि टीकाकार समोर उभा राहिला.  भव्य शिल्प, दिव्य कला मागे पडली आणि बारीकसारीक कंटाळवाणे नक्षीकाम निर्माण होऊ लागले.  त्यात कल्पनेची किंवा आदर्शाची उदात्तता दिसून येत नसे.  भाषेतील जोर गेला.  किती विपुल आणि सामर्थ्यसंपन्न भाषा होती; आणि साधी असून पुन्हा किती प्रभावी वाटे !  परंतु ते सारे जाऊन तिच्या जागी अलंकारिक, कृत्रिम, समासप्रचुर अशी क्लिष्ट भाषा आली.  पूर्वी साहसीवृत्ती होती; जिवनस्त्रोत दुथडी वाहात होता.  त्यामुळे दूर दूर जाऊन नवीन नवीन वसाहती आपण वसविल्या.  त्या वसाहतींच्या केवढाल्या योजना, विशाल कल्पना ! भारतीय संस्कृती कितीतरी दूरदूरच्या देशांत आपण नव्याने रुजवली.  परंतु तो चैतन्यपूर ओसरला.  ती साहसी वृत्ती अस्तंगत झाली.  कूपमंडूकपणाने समुद्रपर्यटनही आता निषिध्द ठरविले.  आरंभीच्या काळी सर्वत्र दिसणारी ती जिवंत जिज्ञासा, तो संशोधक बुध्दिवाद, ज्यामुळे पुढे विज्ञानातही आपण भरपूर प्रगती केली असती, ती जाऊन त्यांची जागा अंधश्रध्देने घेतली.  भूतकालाची आंधळेपणाने पूजा करणे ऐवढेच शिल्लक राहिले.  भारतीय जीवनाचा प्रवाह मंदमंद होत भूतकालात अटकून पडलेला, शतकाशतकांच्या जमलेल्या गाळातून हळूहळू जेमतेम वाहताना दिसतो.  भूतकालाच्या अजस्त्र ओझ्याखाली भारतीय जीवन चिरडून गेलेले दिसते व सर्वत्र एक प्रकारची मूर्च्छा पसरलेली दिसते.  मनाच्या अशा निष्क्रिय व चैतन्यहीन स्थितीत आणि देहाला अपार थकवा आलेला असताना भारताचा झपाट्याने र्‍हास होत गेला, व जगातील बाकीचे देश पुढे जात असता भारत देश अंग ताठून निपचीत पडून राहिला यात आश्चर्य नाही. 

परंतु हे असे वर्णन म्हणजे संपूर्ण सत्य नव्हे.  केवळ गतिहीनच आपण शतकानुशतके असतो, केवळ साचलेल्या डबक्यातच बसून असतो तर भूतकाळाशी अजिबात संबंध सुटला असता.  परंपरा, अखंड प्रवाह राहता ना.  केवळ दगडासारखे अचल, निर्जीव आपण शेकडो वर्षे राहिली असतो तर पूर्वीच्या युगाचा संपूर्ण अंत झाला असता आणि त्याच्या भग्नावशेषांवर काही नवीन, जिवंत उगवलेले दिसले असते, नवीन उभारणी दिसली असती.  परंतु असा पूर्वीच्या युगाचा अंत होऊन खंड पडलेला दिसत नाही, उलट परंपरा अखंड चाललेली दिसते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
Star

new comment

Star

hello

Star

+8 cooment

Star

This has too many comments.

Star

Loving this book.

Star

Finally.

Star

+2 bhai

Star

+1 bhai

Star

Great book.

இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel